अमळनेर : तालुक्यातील शिरूड येथे गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नाले, धरणे भरून वाहत असून गावातील अनेक भागांत पावसाचे घरांत पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
गावातील आदिवासी वस्तीतील अनेक घरांमध्ये रात्रीपासूनच पाणी शिरले असून काही मातीची घरे गळू लागली आहेत. अनेक कुटुंबांना रात्रभर जागून उभे राहण्याची वेळ आली. घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने उभी पिके पाण्याखाली गेली असून पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेचकाही ठिकाणी बंधारे तुटून वाहून गेल्याने शेतीचेही नुकसान झाले आहे.
बैलांचे गोठे आणि जनावरांची शेड पाण्याखाली गेल्यामुळे चारा वाहून गेला असून अनेक ठिकाणी साठवलेला चारा पूर्णपणे भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, गावातील अंगणवाडी केंद्रातही कमरेच्यावर पर्यंत पावसाचे पाणी शिरल्याने महत्त्वाची कागदपत्रे, दप्तरे व शैक्षणिक साहित्य भिजले आहे. गावातील तरुणांनी तत्परता दाखवत साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
गावाच्या चारही बाजूंनी नाले ओसंडून वाहत असल्याने शिरूडचा बाहेरील संपर्क जवळपास तुटला आहे. सकाळपासून गावाबाहेर जाणे तसेच बाहेरून कोणत्याही वाहनाला गावात प्रवेश करणे अत्यंत कठीण झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


