अमळनेर : दीपक पाटील – तालुक्यातील शहापूर येथील राकेश रतिलाल पाटील (वय ३२) या युवा शेतकऱ्याचा मंगळवार दि. २३ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास शेतात वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश पाटील हे त्यांच्या आई व मजुरांसोबत शेतात कामासाठी गेले होते. दुपारी अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी लावण्यासाठी राकेश घाईघाईने निघाले असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी राकेश यांची आई व काही मजूर निंबाच्या झाडाखाली थांबलेले होते. आईच्या डोळ्यासमोरच ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या आईचा आक्रोश अत्यंत वेदनादायी होता.
दरम्यान, विजेचा फटका इतका तीव्र होता की राकेश यांच्या अंगावरील कपडे तसेच गळ्यातील रुमालदेखील जळाल्याचे निदर्शनास आले.
घटनेनंतर त्यांना तात्काळ अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. सायंकाळी उशिरा शहापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राकेश यांचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी तसेच दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.




