अमळनेर : पोलीस वृत्त न्यूज बालविवाहामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्यांच्या अनुशंगाने बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. मात्र तरीही छुप्या पद्धतीने किंवा अशिक्षितपणामुळे बालविवाह होणे सुरूच आहे. कालच भिलाली येथे कायद्याचे उल्लंघन करून विवाह झाल्याचे निष्पन्न झाल्याने मारवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. हा प्रकार निंदनीय आहे. बालविवाह रोखण्यासाठी पुरोहितांचे योगदान महत्त्वाचे आहे. मात्र सामाजिक जाणीव ठेवून बालविवाहाच्या या भस्मासुराचे दहन करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यामुळे आपण या चळवळीत झोकून द्यावे, असे आवाहन प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी केले.
जागतिक बालविवाह निर्मूलन सप्ताह – “जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन” अंतर्गत आधार बहुउद्देशीय संस्था, मंगळग्रह सेवा संस्था व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ रोजी श्री मंगळग्रह मंदिर परिसरात जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, रवींद्र मोरे, कार्यालय अधीक्षक भरत पाटील, हिशेबनीस मनोहर तायडे, पुरोहित संघाचे राजेंद्र निजामपूरकर, प्रफुल्ल जोशी, नंदू जहागीरदार, मंदार कुलकर्णी, आधार संस्थेचे प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मुरलीधर बिरारी, राकेश महाजन, समाधान अहिरे, वंदना पावरा, सोनाली वसावे तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी व मंगळ सेवेकरी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रफुल्ल जोशी, मंदार कुलकर्णी, दिलीप बहिरम आणि भरत पाटील यांनीही बालविवाह थांबावेत यादृष्टीने समाज, पुरोहित संघ व प्रशासन यांनी आपापली भूमिका सजगतेने पार पाडावी व सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी सर्व उपस्थितांनी बालविवाह प्रतिबंधाची शपथ घेतली.


