भुसावळ: पोलीस वृत्त ऑनलाईन– वरणगाव येथून जवळच असलेल्या सुसरी शिवारात दुपारच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली आहे. वीज पडल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.
सुसरी ता. भुसावळ येथील शेत शिवारात १:३० वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडला. त्या दरम्यान शेतातून काम आटोपून घरी जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन महिलांच्या अंगावर विज पडून त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असुन वरणगाव पोलिसांत आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे
तालुक्यात सतत पाऊस सुरु असल्याने शेतकर्यांचे शेतींची कामे खोळंबली आहे. मात्र आज (ता. २६ ) मंगळवार सकाळ पासुन कोरडे वातावरण असल्याने शेतकरी वर्ग मजुरांसह शेतात होते. त्याच दृष्टीने सुसरी ता. भुसावळ येथील शेतमजूर रविंद्र सदाशिव तळेले (वय ४० ) हे मिनाक्षी रविंद्र तळेले वय ( ३४ ) व अनिता उर्फ ममता विनोद पाटील (वय३३ ) या महिलांसह विल्हाळे शिवारातील शेतात कामांमध्ये गर्क असतांना अचानक दीड ते दोन वाजेच्या दरम्यान विजांच्या गर्जनांसह पावसाला सुरूवात झाली.
अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची धांदल उडाली. सोबत असलेले रविंद्र तळेले हे गुरांचे वैरण चिखलाने घाण होईल त्यामूळे ते शंभर मिटर अंतरावर बैलगाडीत वैरण टाकत होते. अनिता उर्फ ममता पाटिल व मिनाक्षी तळेले या मजूर महिला पाऊस सुरू असतांना बैलगाडीकडे येत असतांना अचानक या महीलांवर वीज कोसळल्याने यात या दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. तसेच शेजारील शेतात काम करणार्या वत्सलाबाई आनंदा तळेले (वय ५५ ) यांना सुध्दा जबर झटका बसल्याने त्या जखमी झाल्या आहेत. तर, रविंद्र तळेले हे त्या महिलांपासुन काही अंतरावर असल्याने ते सुदैवाने बचावले आहेत. सदर घटनेची फिर्याद पोलिस पाटिल नितिन पुंडलीक पाटिल यांनी दिल्याने वरणगाव पोलिसांत आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही महिलांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे गावात शोककळा पसरली आहे.


