अमळनेर: तालुक्यातील जवखेडा येथील निलेश उर्फ ओम युवराज पाटील या १५ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना ९ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. निलेश (ओम ) च्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे की, निलेश हा काही कामानिमित्त रात्री ८ ते साडे आठ वाजेच्या सुमारास शेजारी राहणारे काकांच्या घरी त्याचा मोठा भाऊ अनिल सोबत गेला होता. तिथेच त्याला सर्पदंश झाला. मात्र लक्षात न आल्याने दुर्लक्ष झाले आणि बराच वेळ वाया गेला. थोड्या वेळाने त्याला त्रास होऊ लागल्याने निलेशला वावडे येथील प्राथमिक उप आरोग्य केंद्रात दाखविले. तेथील डॉ. विजय ठाकरे

यांनी तपासले असता, त्यांन सर्पदंशाची शंका आली आणि ताबडतोब अमळेनर येथे वरिष्ठ डॉक्टरांना दाखविण्याचा सल्ला दिला. निलेशला अमळनेर येथील एका खाजगी दवाखान्यात दाखवलले असता निलेश गतप्राण झाला होता. सर्पदंश झाल्याचे वेळीच लक्षात आले असते आणि त्याला ताबडतोब अमळनेर येथील दवाखान्यात दाखल केले असते तर कदाचित निलेशचे प्राण वाचले असते.
जवखेडा येथील विद्यालयात इयत्ता ९ वीत शिकणारा निलेश हा अभ्यासात अत्यंत हुशार होता. निलेशच्या मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्यावर १० रोजी सकाळी १० वाजता जवखेडा येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

