जळगाव: भाजपा आ सुरेश भोळे यांच्याकडून शिंदे – फडणवीस सरकारचे अभिनंदन सर्वसामान्य शेतकऱ्यालाही बाजार समितीची निवडणूक लढवण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे राजु मामा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे अभिनंदन केले आहे. बळीराजाला बाजार समिती निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार देण्याबरोबरच आता निवडणूक लढविण्याचा अधिकारही देऊन शिंदे - फडणवीस सरकारने बळीराजाला बंधमुक्त करून न्याय दिला आहे , असेही आ राजु मामा यांनी पत्रकात म्हटले आहे.

आ सुरेश भोळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की , शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणूक लढविण्यास परवानगी देण्यासाठी कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना निवडणूक लढवण्यास परवानगी दिल्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजात सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व आणि प्रत्यक्ष सहभाग वाढणार आहे.
देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत असताना शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला. शिंदे – फडणवीस सरकारने सत्तेवर आल्या आल्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार पुन्हा बहाल केला. आता त्यापुढे एक पाऊल टाकत शिंदे – फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणूक लढविण्यासाठी अधिनियमात दुरुस्ती केली आहे. ज्या शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतमालाच्या विक्रीसाठी बाजार समिती व्यवस्था तयार करण्यात आली त्या व्यवस्थेत शेतकऱ्याला सहभाग घेण्याचा अधिकार देऊन शिंदे- फडणवीस सरकारने बळीराजाला प्रस्थापितांच्या तावडीतून बंधमुक्त केले आहे , असेही जिल्हाध्यक्ष आ सुरेश भोळे यांनी आज या प्रसिद्धीपत्रका द्वारे कळविले आहे

