अमळनेर: तालुक्यातील खवशी गावातील तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास घडली. विरेंद्र उर्फ विरू अण्णा तलवारे (७) हा तलावाच्या पाण्यात उतरल्याचे लक्षात येताच त्याचे वडील अण्णा एकनाथ तलवारे (३२) यांनी मुलाला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, तलावातील गाळात दोघेही अडकल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, विरू सकाळी तलावाजवळ खेळत होता. खेळता खेळता तो अचानक तलावाच्या पाण्यात उतरला. मुलगा पाण्यात गेल्याचे निदर्शनास येताच अण्णा तलवारे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला वाचविण्यासाठी तलावात धाव घेतली. मात्र, तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याने दोघेही त्यात अडकले. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही जीव गेला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. या घटनेने खवशी गावावर शोककळा पसरली असून, तलावातील गाळ आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अण्णा तलवारे आणि त्यांचा मुलगा विरू हे मूळचे आर्वी, ता. जि. धुळे येथील रहिवासी होते. उदरनिर्वाहासाठी ते सध्या अण्णा तलवारे यांच्या सासुरवाडी असलेल्या खवशी येथे वास्तव्यास होते. या दुर्दैवी घटनेने तलवारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बाप-लेकाच्या अकाली निधनाने खवशीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
