प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ असलेल्या लोहगड किल्ल्यावर १८ जून रोजी एक धक्कादायक घटना घडली होती. येथील एका कठड्यावरून २६ वर्षीय केतन विशाल अग्रवाल याचा दरीत कोसळून मृत्यू झाला होता.

तो आपली होणारी पत्नी सिया गोयलसह लोहगडावर फिरायला गेला होता. याच वळी ही घटना घडली होती. सुरुवातीला हा एक दुर्दैवी अपघात असल्याचं मानलं जात होतं. पोलिसांनी तशी अपघाती मृत्यूची नोंदही केली होती. मात्र आता हा अपघात नसून घातपात असल्याचं समोर आलं आहे. सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनीच केतनला लोहगडावरून धक्का मारून त्याची हत्या केली, असं पोलीस तपासात समोर आलं आहे.
लोहगडावर झालेल्या हत्याकांडाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता सिया गोयलबाबत अनेक खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. तिच्या खासगी आयुष्याबाबत संतप्त माहिती समोर येत आहे. खरं तर, सियाचा जेव्हा केतनसोबत विवाह ठरला होता. तेव्हाही ती आपल्या बॉयफ्रेंडच्या संपर्कात होती. दोघांच्या अनेकदा भेटीगाठी होत होत्या, अशी माहिती समोर आली आहे. ज्यावेळी सियावर संशय आला तेव्हा पोलिसांनी सिया आणि चेतन यांची कॉल हिस्ट्री चेक केली. तेव्हा सिया ही चेतनच्या प्रेमात पूर्णपणे आंधळी झाल्याची माहिती समोर आली आहे.
कारण, मागच्या सहा महिन्यात सिया आणि चेतन यांच्यात तब्बल २००४ वेळा कॉल झाला आहे. एकूणच ही आकडेवारी लक्षात घेतली तर दोघांमध्ये दररोज सरासरी ११ ते १२ कॉल होत होते. त्यांनी मागच्या सहा महिन्यात तब्बल १४ हजार २८० मिनिटं संवाद साधला होता. ते दोघंही रातनरात एकमेकांशी बोलायचे. पण सियासोबत सुखी संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या केतनला याबाबत काहीच माहिती नव्हती.
या संपूर्ण प्रकरणावर केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सियाबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहे. सिया ही मागील काही वर्षांपासून चेतन चौधरीसोबत प्रेमसंबंधात होती. तिचे इतरही अनेक अफेअर्स होते. तिच्या बऱ्याच भानगडी होत्या.तिचं केतनसोबत लग्न ठरलेलं असताना देखील ती चेतनसोबत हनिमूनला गेली होती. दोघंही फिरायला गेले होते, असा दावा केतनच्या वडिलांनी केला आहे.
शिवाय सियाच्या या अफेअरबद्दल तिच्या कुटुंबीयांना माहीत होतं. मात्र त्यांनी ही बाब आपल्यापासून लपवली. मुलीचं चालचलन ठीक नाहीये, पण तिचं लग्न झालं तर ती सुधारेल, असा विचार करून सियाच्या कुटुंबीयांनी या लग्नासाठी गळ घातली. आम्ही गोयल यांना मागील ३५-४० वर्षांपासून ओळखतो. आमच्यात चांगले संबंध होते, त्यामुळे ही सोयरीक जुळवली होती. मात्र सियाने माझ्या मुलाचा जीव घेतला, अशी माहिती केतनच्या वडिलांनी दिली.



