जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे गृहोपयोगी संच वाटप करताना ‘केवायसी’ करण्याच्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Jalgaon ACB Case) मुद्देमालासह पकडले.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जळगाव शहरातील एका तक्रारदाराने ९ एप्रिल रोजी योजनेंतर्गत गृहोपयोगी संच मिळविण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानंतर बुधवारी (ता. १५) त्यांना चिंचोली (ता. जळगाव) येथे संच घेण्यासाठी बोलावण्यात आले होते.
तक्रारदार तेथे उपस्थित राहिल्यानंतर, संच देण्यापूर्वी ‘केवायसी’ करावी लागेल आणि त्यासाठी १०० रुपये द्यावे लागतील, अशी मागणी महिला लोकसेवक आसमा परवीन शेख इरफान (वय ३८, रा. शिवाजीनगर, जळगाव) यांनी केली.
याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर, निरीक्षक रेश्मा अवतारे, स्मिता नवघरे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी आसमा शेख यांनी पंचांसमक्ष १०० रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.
टेबलखाली सापडली अन्य रोकड
कारवाईदरम्यान संशयित महिला कर्मचारी बसलेल्या टेबलाखालील पत्रपेटीत ४१ हजार २५० रुपयांची रोकड आढळून आली. त्यामुळे इतर लाभार्थ्यांकडूनही रक्कम गोळा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ७५८८६६१०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

