भुसावळ । पोलीस वृत्त ऑनलाईन जळगाव जिल्ह्यातील साकरी (ता. भुसावळ) येथे शिकवणीसाठी निघालेल्या दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह गावालगत असलेल्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर दोन्ही मुली इयत्ता नववीत शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या दुर्दैवी घटनेने संपूर्ण भुसावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुली साकरी गावातील रहिवासी असून त्या नेहमीप्रमाणे सकाळी घरातून शिकवणीसाठी निघाल्या होत्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घरी परतल्या नसल्याने कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान गावालगतच्या शेतातील विहिरीत त्या पडल्या असाव्यात असा संशय बळावला. विहिरीची पाहणी केली असता दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्यात आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुक्यातील पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही मुलींचा मृत्यू अपघातामुळे झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा तपास पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
एका संशयिताला ताब्यात
या प्रकरणाबाबत माहिती देताना जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, आज सकाळी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार भुसावळ पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. दोन्ही मुलींचे वय अंदाजे पंधरा वर्षे आहे. तक्रार मिळताच पोलीसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. या दरम्यान साकरी गावाजवळील एका विहिरीत दोन मृतदेह आढळून आले. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून ही घटना नेमकी कशी घडली याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणी एका संशयित मुलाला ताब्यात घेण्यात आले असून तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील माहिती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेडिंग


