चोपडा प्रतिनिधी:- गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी शहरातील साने गुरुजी वसाहत मधील एका तरुणाने तरुणीशी विवाह केल्याने ते दोघेही शहराबाहेर आहेत. परंतु त्या दोघांच्या विवाह साठी आकाश संतोष भोई यांनी मदत केल्याच्या कारणावरून दि.२० रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास काही अज्ञात तरुणांनी आकाश भोई याच्यावर शस्त्राने हल्ला चढवला. चाकूने मानेवर वार केले व आसारीने डोक्यावर वार केले. त्यात आकाश भोई हा जबर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. सदर घटनेचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरल्याने सामन्यांमध्ये घबराट पसरली.
शहरातील सर्व लहान मोठे व्यवसायिकांनी दुकानांचे शटर बंद केली. तसेच शहरातील शाळांमधील मुलांना पालकांनी घरी घेऊन जाण्यासाठी गर्दी केली. परंतु पोलिसांना घटना माहिती झाल्याबरोबर घटनास्थळी डीवायएसपी कृषीकेश रावले, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहा. पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, अजित साबळे , घनश्याम तांबे यांनी घटनास्थळी पोलीस कुमक घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दंगल सदृश परिस्थिती नसताना मात्र दंगल झाली अशी अफवा वाऱ्यासारखी पसरल्याने क्षणार्धात चोपडा शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यानंतर मुख्य बाजारपेठ रस्त्यावरील सर्वच दुकानांची शटर बंद झाल्याने शुकशकाट दिसून आला.
डी वाय एस पी कृषीकेश रावले यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. वातावरण चिघळू शकते असे डीवायएसपी कृषीकेश रावले यांनी दुकान चालकांना सांगितल्याने चार वाजेनंतर पुन्हा छोटे-मोठे व्यवसायिकांनी दुकाने बंद केली. चोपडा शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून वैयक्तिक कारणावरून झालेल्या वादामध्ये कोण कोण समाविष्ट आहे याबाबत पोलीस कसून चौकशी करीत आहेत.
परिस्थिती जरी नियंत्रणात असली तरी शहरात तणावपूर्ण शांतता आहे. मात्र सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


