अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन – लष्करात नोकरी लावून देतो, म्हणून घेतलेले दोन लाख रुपये परत दिले नाहीत व नोकरीही लावून दिली नाही, त्यामुळे नैराश्यात येत तालुक्यातील देवळी येथील सागर संजय बैसाणे या तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील तिन्ही प्रशिक्षकांविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळी येथील सागर संजय बैसाणे हा २०२१मध्ये म्हैसाळ (ता. मिरज, जि.सांगली) येथील एका अकादमीमध्ये सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण घेत होता. तेथे असलेले प्रशिक्षक सुशांत सुनील उबाडे (वाळेखिंडी, सांगली), अकादमीचे संस्थापक अनिल कांबळे (कर्मवीर नगर म्हैसाळ, ता. मिरज) महादेव विलास सातपुते (लोणारवाडी, सांगली) यांनी ७ एप्रिल २०२२ रोजी सागर याला मिलिटरीच्या बीआरओमध्ये नोकरीला लावण्यासाठी साडेसहा लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी त्यांना एक लाख रुपये देण्यात आले.

त्यानंतर अनिल कांबळे याला दुर्धर आजार जडल्याने अकादमी बंद करण्यात आली. पुन्हा ऑक्टोबर २०२२मध्ये प्रशिक्षक सुशांत उबाळे याने तरुणाकडून नोकरीसाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. तिघांनी सागर याला सरकारी नोकरी न देता कॅन्टीनमध्ये मजुरीला लावून देत त्यांची फसवणूक केली.
नोकरी मिळत नसल्याने सागर याने संशयितांना दिलेले दोन लाख रुपये परत मागितले. परंतु त्यांनी पैसे परत देण्यास नकार दिला. म्हणून वैतागून सागर याने २२ जानेवारी रोजी रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. सागरचे काका सुभाष बैसणे यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत

