चंद्रपूर: पोलीस वृत्त – समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूर शहरातील बाबुपेठ भागातील एकाच कुटुंबातील ५ जण ठार झाले. चंद्रपूरवरून अकोलाकडे चारचाकी वाहनाने अमरावतीच्या दिशेने जात असताना त्यांच्या वाहनाने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली.

या धडकेत ५ जण जागीच ठार झाले.
मृतकामध्ये महादेव जिवाजी जीवने (६५ वर्षीय) लताबाई महादेव जीवने (६० वर्षीय) भास्कर महादेव जीवने (४३ वर्षीय) आरती भास्कर जीवने (४१ वर्षीय) आणि जीज्ञा भास्कर जीवने (१२ वर्षीय) यांचा समावेश आहे.
चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले, कार थेट कंटेनरला जाऊन धडकली
जीवने कुटुंब अकोल्याच्या दिशेने समृद्धी महामार्गावरून जात होते. धामणगाव रेल्वेजवळील चॅनेल क्रमांक १०५ जवळ रस्त्याच्या कडेला ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा होता. इतक्यात जीवने कुटुंबाचे चारचाकी वाहन त्या लेनवर आली. मात्र चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने कार थेट कंटेनरला जाऊन धडकली.
एकाच कुटुंबातील पाच जण गेले, चंद्रपुरात शोककळा
घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस व महामार्ग पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. कारमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघाताचे वृत्त बाबुपेठ परिसरात पोहोचल्यावर परिसरात शोककळा पसरली.
नवरा- कोळसा खाणीत इंजिनिअर, बायको जिल्हा परिषदेत अधिकारी
भास्कर जीवने सरकारी कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या भटाळी कोळसा खाणीत मायनिंग अभियंता होते. त्यांनी १५ दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला होता. सोबतच त्यांची पत्नी आरती शासकीय नोकरीवर असून त्यांची बदली अकोला जिल्हा परिषदेमध्ये झाली होती. तिथला पदभार घेण्यासाठी कुटुंब अकोला येथे निघाले होते. मात्र वाटेतच कुटुंबावर काळाने घाला घातला.


